पुणे : ‘रूग्णांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी एकत्रित उपचार पद्धती हाच भविष्यकाळातील मार्ग असून, त्यासाठी सर्व पॅथीच्या डॉक्टरांनी एकत्र येणे, ही काळाची व समाजाची गरज आहे,’ असे मत एस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटणकर यांनी व्यक्त केले. आरोग्यभारती व एस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धन्वंतरी आरोग्यरत्न पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, आयकर विभाग अहमदाबाद झोनचे सहआयुक्त डॉ. उमेश फडे आणि आयुर्वेद ग्रामचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुकुमार सरदेशमुख यांना धन्वंतरी आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणेरी पगडी, सन्मान चिन्ह आणि औषधी वनस्पती असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
संचेती रुग्णालयाचे संस्थापक पद्मविभुषण डॉ. कांतीलाल संचेती, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, आरोग्य भारतीचे मुकेश कसबेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. दबडगाव आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
डॉ. पाटणकर म्हणाले, ‘आधुनिक शास्त्राबरोबरच आपल्या ग्रंथांमध्ये जे शास्त्र आहे. त्याचाही शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार होणे आवश्यक आहे. आयुर्वेदाकडे बर्यारचदा हीन भावनेने पहिले जाते. या आपल्या जुन्या शास्त्रावर आधारित अधिक संशोधन होण्याची गरज आहे. त्यामुळे भारतीय वैद्यक शास्त्राला फार मोठी दिशा मिळेल. अन्यथा योग आणि आयुर्वेद हे परदेशातून भारतात येतील.’
डॉ. संचेती म्हणाले, ‘फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच आता संपली आहे. पूर्वी आरोग्याच्या प्रश्नांबरोबरच कुटुंबातील अनेक प्रश्न फॅमिली डॉक्टरकडे विश्वासाने सोपवले जायचे. मी एकटा करून दाखवेन हे आजकालच्या परिस्थितीत वैद्यकीय शास्त्रातही शक्य नाही. त्यामुळे सर्व पॅथीच्या डॉक्टरांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.’
डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘फॅमिली डॉक्टर या संकल्पनेतून डॉक्टर आणि रुग्ण याच्यामध्ये कौटुंबिक नाते तयार होते; परंतु दुर्दैवाने ही संकल्पना संपली आहे. कृत्रिम उपचार पद्धती तयार होणे धोकादायक असून, त्याबाबत विचार करण्याची गरज आहे.’
डॉ. एकबोटे म्हणाले, ‘ तीनही पॅथीच्या डॉक्टरांना धन्वंतरी आरोग्य पुरस्काराने गौरविणे ही सकारात्मक बाब असून, अशी रत्ने समाजासमोर आणण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम नक्की उपयोगी पडतील.’
मुकेश कसबेकर, डॉ. अजय चंदनवाले, डॉ. उमेश फडे आणि वैद्य सुकुमार सरदेशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद जोशी यांनी केले. प्रास्ताविक डॉ. आनंद बर्वे यांनी केले, तर डॉ. अनुपमा गोरडे यांनी आभार मानले.